मी गद्दारी केली नाही! भाजप प्रवेश नंतर काय म्हणाल्या वैशाली सूर्यवंशी.!!!



पाचोरा प्रतिनिधी :-


पाचोरा-भडगाव मतदारसंघातील माजी आमदार वैशाली ताई सूर्यवंशी यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या नव्या राजकीय इनिंगची सुरूवात केली आहे. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यानंतर आज पाचोऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले.


“गद्दारी नव्हे, पक्षांतर”


पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, “होय, मी पक्षांतर केले आहे. पण ही गद्दारी नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडताना मी पळून गेले नाही, तर स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धवसाहेबांना भेटले, त्यांना माझ्या मनातील वेदना आणि निर्णयाची कल्पना दिली. त्यामुळे माझ्या भूमिकेत कोणतीही लपवाछपवी नाही. खुर्ची, पैसा किंवा वैयक्तिक फायद्यासाठी मी हा निर्णय घेतलेला नाही.”


“निष्ठा खुर्चीशी नाही, जनतेशी आहे”


त्यांनी स्पष्ट केले की, त्यांची खरी निष्ठा खुर्चीशी किंवा सत्तेशी नसून मतदारांशी आहे. समाजसेवा आणि विकासाचा ध्यास घेऊनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. “मला ‘पॉलिटिकल अॅक्टिव्हिझम’ हवा होता. लोकसेवेचा नवा मार्ग म्हणून मी भाजपची निवड केली आहे,” असे त्या म्हणाल्या.


“ईडी-सीबीआयची भीती नाही”


भाजपमध्ये प्रवेश हा कोणत्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाखातर घेतलेला निर्णय नसल्याचेही वैशाली ताईंनी स्पष्ट केले. “आमचे सर्व व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक आहेत. आमचे कोणतेही नंबर दोनचे व्यवसाय नाहीत. त्यामुळे ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या भीतीने मी भाजपमध्ये गेले, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. ज्यांनी खोक्यांनी घरे भरलीत, टक्केवारीतून गब्बर झालेत त्यांनाच भीती वाटते. आम्ही निर्भय आहोत,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.


“निर्णय सामूहिक, कार्यकर्त्यांना सोडले नाही”


आपला निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून निकटवर्तीय, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार यांच्याशी चर्चा करून सामूहिक पद्धतीने घेतल्याचे त्यांनी सांगितले. “मी कोणत्याही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाणांचा मोलाचा पाठिंबा


पक्षांतराच्या प्रक्रियेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा ठरल्याचे वैशाली ताईंनी नमूद केले. “वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच मी पक्षांतराचा निर्णय घेतला. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनीही माझ्या विचाराला पाठींबा दिल्याने मला आत्मविश्वास मिळाला,” असे त्यांनी स्पष्ट केले.


“मैदान सोडले नाही”


शेवटी आपल्या राजकीय वाटचालीबद्दल बोलताना वैशाली ताई म्हणाल्या, “मी मैदान सोडलेले नाही. येथेच राहून सेवा करणार, संघर्ष करणार आणि माझ्या वडील तात्यासाहेब सूर्यवंशी यांच्या नावाला शोभेल अशी कामगिरी करणार आहे. भाजपचा विचार हा सेवेचा, देशहिताचा आणि प्रगतीचा आहे. या व्यापक प्रवाहात मी नव्या इनिंगची सुरूवात करत आहे.”


यावेळ माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मधु भाऊ काटे पाचोरा तालुकाध्यक्ष गोविंद शेलार व भाजपाचे पदाधिकारी मोठे संख्येने उपस्थित होते


पत्रकार परिषदेत त्यांनी मतदारसंघातील जनतेला, कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि नव्या वाटचालीसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.